Jul 8, 2009

प्रिय मधू गानू- विजय तेंडुलकर

पु .लं .चें साहित्य


प्रिय मधू गानू,

तर तुम्ही पंचाहत्तर वर्षांचे झालात.
हे मी इतरांसाठी लिहीत नसून माझ्यासाठीच लिहीत आहे.
तुमच्या वयाचे भान मलाच ठेवण्याची गरज आहे. कारण, तुम्ही ते कधीच मला दिले नाही आणि देणार नाही.
दोनच अपवाद.
एक : तुम्ही रंगवून काळी न केलेली तुमची शुभ्र दाढी.
दोन : पुण्यापासून अंतरावरच्या एका वृद्धाश्रमात तुम्ही जागा घेतली असून तिथे तुम्ही आणि मीनाक्षी यानंतर रहायला जाणार असल्याचे तुम्ही तुमच्या मित्रांना सांगत असता. प्रत्यक्षात ते केव्हा घडते? त्याची वाट तुमचे मित्र पाहत आहेत आणि तसे कधी घडेल यावर कुणी कुणी पैजाही लावल्या आहेत. दरम्यान, आठवडयातून कधी इथे तर कधी तिथे अशा फेऱ्या सुरु करून तुम्ही वृद्धाश्रमाचे तुमच्या धावत्या दौऱ्यांसाठी आणखी एक ठिकाण करून, वृद्धाश्रम ते घर, असे नवे धावते दौरे सुरू केले आहेत आणि त्याची मजा तुम्ही 'अभी तो मै जवान हूं' थाटात घेत असता.
याचा अर्थ वृद्धाश्रम हाही तुमच्या वयाचा खरा पुरावा अद्याप तरी नाही.
दाढी हीच खरी.

तर, अगदी बिनचूक बोलायचे तर तुमची दाढी पंचाहत्तर वर्षांची झाली. तुम्ही अजून चोविशीत आहात, असे तुमच्या मित्रांना दिसते. आदल्या जन्मात तुम्ही रेल्वेचे इंजिन असावेत, असे माझ्या मनात क्वचित येऊन गेले आहे.
तुमचा कुठून तरी कुठे तरी जाण्याचा उत्साह मी गेली चाळीस वर्षे (म्हणजे माझ्या वयाची, तुमच्या नव्हे) तरी पाहात आहे. मात्र, कोणतेही रेल्वे इंजिन चाळीस वर्षे एकाच वेगाने विनाविश्रांती धावत राहिल्याची माहिती मला तरी नाही.
अधिक उजवी उपमा द्यायची तर वाऱ्याची देता येईल. तो न थकता सर्व वेळ सर्वत्र वाहत असतो. तुम्हीही न कंटाळता आणि न थकता वाहत असता. कधी पुणे ते मुंबई, कधी पुणे ते कोकणातले कोणतेही गाव, कधी कोल्हापूर, कधी सांगली, कधी सावंतवाडी तर कधी सोलापूर असे तुमचे पोहोचण्याचे ठिकाण जरी बदलले, तरी तुमच्या उत्साहात फरक पडत नाही. कारण ते ठिकाण हे तुमचे खरे उद्दिष्ट नसतेच. तो तुमचा 'भोज्जा' असतो. त्या भोज्ज्याशी पोचलात की काही मिनिटांत तुम्ही परत मूळ ठिकाणी निघण्यासाठी आधी मनाने आणि मग देहाने नव्या उत्साहाने तयार होता. असे भोज्जे ठरवून तुम्ही महाराष्ट्राच्या नकाशावर उभी आडवी शिवाशिवी किंवा पकडापकडी खेळता आणि तुम्ही तुम्हालाच पकडण्याठी धावता असे कधी कधी वाटते. पुन्हा, या 'चर' अवस्थेत तुम्ही ताकद खर्च करण्याऐवजी जमा करीत जाता आणि पोचेपर्यंत तुमच्याकडे परत मूळ ठिकाणी पोचण्याएवढी ती जमा झालेली असते. इतकेच नव्हे तर परत पोचल्यावर नव्या प्रवासासाठी निघायचे म्हटले, तरी तुम्ही तितक्याच उत्साहाने तयार असता.

हा उत्साह कोठून येतो? हे तुमच्या मित्रांना गूढ आहे.
वर्षानुवर्षे 'वाहून' देखील तुमचा याविषयीचा उत्साह ओसरत कसा नाही हे आम्हाला कळत नाही.
त्याअर्थी, तुम्ही वारा नसलात तरी वाऱ्याचे नातलग असलाच पाहिजेत. वारा अशरीरी आहे. त्याला शरीर नसल्याने तो थकण्याचा प्रश्न नाही. पण तुम्ही तर सदेह आहात. देहाला वय असते. तो जुना होतो. नादुरूस्त होतो. थकतो. तुमच्या देहाला हे माहीत नसल्यासारखा तो गेली कित्येक वर्षे तुमच्याबरोबर सर्वभर भटकतो आहे.

हे झाले तुमच्या गतीमानतेबद्दल.
या 'चर' अवस्थेत तुम्ही माणसे जोडता. जोडलेल्यांना पुन्हा भेटता. स्थलकालाने मध्यंतरी पकडलेले अंतर काटून ही रक्तापलीकडली नाती घट्ट करीत असता. जिकडे जाल तिकडे महाराष्ट्रात तुमच्या ओळखी आहेत. तुमच्यावर प्रेम करणारी, तुम्ही यावेत, रहावेत असे वाटणारी माणसे सर्वभर आहेत. ती तुमची वाट बघत असतात. या लोभापायीच असेल कदाचित, पण तुम्हीही क्वचित भोज्जाला शिवून लगेच परत निघण्याची ओढ थोडी तहकूब ठेवून, दोन-चार दिवस एखाद्या गावी, एखाद्या घरी राहता. कदाचित, याला तुमची सहधर्मचारी किंवा अशा दौऱ्यांत बरोबर घेतलेले दोस्तही कारणीभूत असतील. पण राहिलात तरी तुम्ही 'अचर' क्वचितच असता. गावातल्या गावात तुमची भटकंती, ठिकाणे बघणे, कारण शोधून कुठे तरी जाऊन येणे, नवी माणसे जोडणे चालूच असते. मला तर वाटते की, मुक्कामाच्या घरी देखील तुम्ही या खोलीतून त्या खोलीत किंवा या घरातून त्या घरात आणि यातले काही शक्य नसेल तेव्हा मनातल्या मनात जागच्या जागी फिरत असाल. गती हा तुमचा स्वभाव आहे. स्थिर राहणे तुमच्या मनाला मान्य नाही. (झोपेत तरी तुम्ही पूर्णतया बिछान्यातच असता की, स्वप्नात कुठे कुठे जात असता?)

पण असेही दिवस असतात, जेव्हा तुम्ही तुमच्याच घरी असता. म्हणजे जाऊन येऊन असे म्हणू या. तात्पुरती बाहेरगावी नाही तरी गावात, पुण्यात तुमची भ्रमंती चालू असतेच. अगदी घरीही तुम्ही गतीमान्! माणसांची वर्दळ सदैव तुमच्याकडे चालू. माणसे दारातून येतात, तशी खिडकीतून तुमच्याशी संवाद साधतात. दर दोन मिनिटांनी एक या वेगाने फोन येत असतात. एका वेळी दारात, खिडकीत आणि फोनवर माणसे तुमच्याशी बोलताहेत असेही दृश्य दुर्मीळ नसते. एखाद्या मंत्र्याने असूयेने जळावे असा तुमचा जनसंपर्क. हल्लीचे मंत्री स्वत:चीच कामे जास्त करतात, तुम्ही मंत्री नसून इतरांची कामे करता आणि ती आपलीच असल्यासारखी. इतरांच्या कामापायी तुम्हाला सर्व प्रकारची तोशिस पडते. एकेकदा जेवायला उसंत नसते. असेही म्हटले तर चुकणार नाही की, इतरांच्या कामांच्या चिंतांत तुम्ही स्वत:चा आणि पत्नी मीनाक्षीचा विचारदेखील विसरलेले असता. माणसे तुमच्या दारातून रिकाम्या पोटी कधीच परतत नाहीत. प्रत्येकाचा दिलखुलास पाहुणचार झालाच पाहिजे असा तुमचा आग्रह असतो. (त्याचबरोबर कुणाकडे गेले असता कारणाशिवाय चहासाठी थांबायचे नाही - कार्यबाहुल्याचे खरे कारण असतेच. - हाही आग्रह. माझाच प्रदीर्घ अनुभव.) यामुळे घरीच असता तेव्हाही तुम्ही प्रवासात असल्यासारखे धावपळीत असता. याउलट, तुमच्याकडे आलेले स्वत:च्या घरी असावेत तसे निवांत. तसे त्यांनी असावे असा तुमचा प्रयत्न असतो. त्यांना घरी स्थिर करून तुम्ही चपला चढवून दोन-चार कामे करुन आलात, असेही दिसते.

तुमच्या व्यक्तिगत जगातली माणसे कोणत्याही एका प्रकारची, स्तरातली, जातीची किंवा व्यवसायातली म्हणता येणार नाहीत. यात रिक्षावाला येतो आणि संपादकही येतो. शिक्षक येतो तसा शेतकरीही येतो. निकषच शोधायचा तर तुम्हाला अकृत्रिम स्नेहाची ओढ आहे. तोंडापुरते प्रेम, कामापुरते अगत्य आणि खोटेपणा तुम्हाला चालत नाही. तुम्ही मनापासून आणि हातचे न राखता प्रेम देता आणि तसेच तुम्हाला मिळावे अशी तुमची अपेक्षा असते. कोणीतरी जातीवादी माझ्याकडे म्हणाला होता की, गानू कोकणस्थ असून वृत्तीने देशस्थ आहेत; ते तुमच्या या वृत्तीला उद्देशून असावे. देशस्थ दिलदार असतात आणि कोकणस्थ कंजूष, असा प्रवाद या समाजामागे आहे. कंजूष देशस्थ आणि तुमच्यासारखे उदार कोकणस्थ मला भेटले आहेत, हे इथे नमूद केले पाहिजे. माणसांचेच तुम्ही लोभी. परंतु, लेखक, संपादक, गायक आणि नट यांना तुमच्या व्यक्तिगत जगात विशेष पसंती आणि सवलती. नट मित्रांची नाटके, चित्रपट आणि सीरियल तुम्ही आठवणीने आणि आवर्जून बघणार. गायक मित्रांच्या बैठकांना आणि मित्र वक्त्यांच्या भाषणांना तुम्ही आग्रहाने जाणार, पुढची जागा पकडून बसणार आणि भरपूर उत्तेजनपर माना डोलावणार. यातले काही विशेष आवडले, तर ते इतरांनी बघावे आणि ऐकावे म्हणून स्वत: त्याचे प्रयोग लावणार आणि घरचे कार्य असावे तसे त्यासाठी खपणार. संपादक मित्र आहे, या कारणाने तुम्ही त्याचे वर्तमानपत्र बदलले (ही अलीकडली पोलीस खात्यातली आणि वर्तमानपत्रांच्या जगातली नवी चाल. सारख्या बदल्या.) की, तुमच्या घरचे वर्तमानपत्र बदलते.

मात्र, केवळ मित्रकर्तव्य म्हणून तुम्ही या गोष्टी करता असे कोणीही म्हणू शकणार नाही. तुमचा सांस्कृतिक उत्साह या पलीकडला आहे. पुण्याच्या संपन्न सांस्कृतिक जगातले तुम्ही बिनीचे, अथक, हक्काचे आणि नियमीत श्रोते, प्रेक्षक आणि वाचक आहात.

... अपूर्ण
- श्री. विजय तेंडुलकर
('सहवास गुणीजनांचा' या मधू गानूंच्या पुस्तकातील प्रस्तावनेतील काही भाग)

एक जानेवारी : एक संकल्प दिन

नव्या वर्षाचे स्वागत आपण हसतमुखाने करु या, अर्थात दाढ वगैरे दुखत नसेल तर. साध्या मुखाचे हसतमुख करण्यात ती एक अडचण असते. ते एक असो. नव्या वर्षाचा पहिला दिवस हा नवे संकल्प सोडायचा दिवस असतो. या बाबतीत पुरुषवर्गाचा उत्साह दांडगा. नव्या वर्षाच्या प्रथम दिवशी पुरुषांच्या उत्साहाने स्त्रियांनी काही नवा संकल्प सोडल्याचे आमच्या ऐकिवात नाही. 'आहेत त्या साडया फाटून गेल्याशिवाय नवीन घेणार नाही' अशा नमुन्याचा किंवा 'सिगरेट सोडली' या चाली वर 'पावडर सोडली' हा थाटाचा संपूर्ण इहवादी संकल्प एक जानेवारीचा मुहूर्त साधून सोडलेली स्त्री आमच्या पाहण्यात नाही. आलीच तर तिला आम्ही कडकडून भेटायला तयार आहो. (हा केवळ भाषाविलास) पुरुष मंडळींना मात्र असले-म्हणजे साडी फाटेपर्यंत नवीन घेण्याचे नव्हे-सिगरेट सोडण्याचे, स्वखर्चाने दारु न पिण्याचे वगैरे संकल्प सोडल्याशिवाय एक जानेवारी हा दिन साजरा झाल्यासारखे किंवा नव्या वर्षाचे आपण यथायोग्य स्वागत केल्यासारखे वाटत नाही. एक जानेवारी पासून सिगरेट ओढायची नाही हा मात्र बराच लोकप्रिय संकल्प आहे. मात्र त्याला दोन जानेवारीपासूनच फाटे फुटतात.
पहिला फाटा : पाकीट घ्यायचं नाही. एकेक सुटी सिगरेट घ्यायची.

दुसरा फाटा : अर्धीअर्धी ओढायची.
तिसरा फाटा : दुसऱ्या कोणी दिली तरच ओढायची.
चौथा फाटा : रात्री नऊच्या पुढे ओढायची नाही.
पाचवा फाटा : फक्त जेवणानंतर ओढायची.
सहावा फाटा : चहा व जेवणानंतर.
सातवा फाटा : रात्री नऊऐवजी दहाच्या पुढे ओढायची नाही.
आठवा फाटा : इंपोर्टेड सिगरेटमधला टोबॅको प्युअर असल्यामुळे ते पाकीटच्या पाकीट ओढले
तरी नो हार्म इज कॉजड् इ.इ.

...'सिगरेट सोडणे' या प्रमाणे एक जानेवारीपासून नित्यनेमाने डायरी लिहिणे, पहाटे उठून मैदानात फिरायला जाणे, गच्चीवर फेऱ्या घालणे, अंगणात फेऱ्या घालणे, घरातल्या घरात फेऱ्या घालणे, योगासने करणे, जागच्या जागी धावणे, हे देखील सुप्रासिद्ध संकल्प आहेत. आम्ही दर ५-६ वर्षांनी आलटूनपालटून हे संकल्प नव्या उमेदीने सोडीत आलो आहो...

... ते काही का असेना, एक जानेवारी आली की नवे संकल्प मनात गर्दी करायला लागतात आणि भेटीदाखल येणाऱ्या डायरीची प्रातिक्षा सुरु होते. हा नव्या संकल्पात कालमानाप्रामाणे जुनी पत्रे एकदा नीट पाहून, नको असलेली फाडून टाकून व्यवस्थित लावून ठेवावी, ठिकठिकाणी निर्वासितांसारख्या तळ ठोकून पडलेल्या पुस्तकांच्या आणि मासिकांच्या गठ्ठयावरची धूळ झटकून त्यांची विषयवार विभागणी करुन, वहीत नोंद करावी असे काही संसारोपयोगी संकल्पही असतात. ते पार पडतात की नाही याला महत्त्व नाही. खरी मजा वेळोवेळी आपल्याला कुठले संकल्प सोडावेसे वाटले ते पाहण्यात आहे. ते नाही पाळता आले म्हणून हताश होऊ नये...

... संकल्पाचा आनंद हा प्रत्यक्षाहून अधिक असतो. फार तर सकाळी उठणे, डायरी लिहिणे, सिगरेट न ओढणे, एकदाच जेवणे अशा सद्गुणांची ही मानसपूजा आहे असे मानावे. कल्पनेतल्या धूपदीपांनी जिथे देव खूष होतो तिथे कल्पनेतल्या सज्जनपणाने माणसाने तृप्त राहायला काय हरकत आहे?

तेव्हा आजचा दिवस हा असा कृतीची जबाबदारी न घेता सद्गुणवर्धक संकल्प सोडण्याचा. तो सोडणार असल्याने चारचौघात सांगण्याचा आणि फार तर दोन ते सहा-सात जानेवारींपर्यंत टिकवण्याचा. कुणाचा गणपती दीड दिवसाचा,तर कुणाचा दहा दिवसांचा असतो. तीच गोष्ट संकल्पाची. पुष्कळदा वाटतं की नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प सोडायची जगातल्या इतक्या लोकांना जर हौस आहे तर एक जानेवारी हा संकल्प-दिन म्हणून साऱ्या जगाने का साजरा करु नये? आपल्या देशात वर्षाचे दिवस तीनशे पासष्ट असले तरी 'दिन' पाच-सहाशे असतील. 'दिनांच्या दिवशी जरी जाहीर संकल्प सोडला तरी तो दुसऱ्या दिवशीसुद्धा पाळायची गरज नसते' हा धडा आपल्या मान्यवर नेत्यांनीच नाही का आपल्याला घालून दिला? शिवाय एक जानेवारी हा दिन संकल्प-दिन म्हणून साजरा करण्यावाचून आपल्याला गती नाही. 'यंदाच्या वर्षी कुठलाही संकल्प सोडणार नाही,'असे म्हणणेहे देखील संकल्प न सोडण्याचा संकल्प सोडण्यासारखेच आहे.
तेव्हा आजच्या या शुभदिनी आपण सारेजण 'सत्य संकल्पाचा दाता भगवान' असे म्हणू या आणि कुठला तरी संकल्प सोडून नव्या वर्षाचे-एव्हाना दाढदुखी बंद होऊन डोकेदुखी सुरु झाली नसेल तर- हसतमुखाने स्वागत करु या...


पुढे वाचा ........

प्रिय मधु गानू

मी-एक नापास आजोबा

सध्या तुम्ही काय करता? या प्रश्राचं दोन नातवांशी खेळत असतो याच्या इतकं सत्याच्या जवळ जाणारं उत्तर माझ्यापाशी नाही. नातवंडांची तलफ कशी येते हे आजोबा-आजीच जाणतात. नातवंड हे म्हातारपणात लागणारं जबरदस्त व्यसन आहे. गुडघ्यांच्या संधिवातावर अचपळ नातवामागून धावणं हा रामबाण उपाय आहे. आणि एरवी खांदेदुखीमुळे वर न जाणारे हात नातवंडांना उंच उचलतांना जरासुद्दा तक्रार करीत नाहीत.
उत्तम बुध्धिमत्तेचा सगळयात चांगला प्रत्यय चांगल्या बालबुध्धितून कसा येतो हे दुसऱ्या बालपणाची पहिल्या बालपणाशी दोस्ति जमल्या शिवाय कळत नाही. माझ्या बुध्धिमत्तेविषयी बाळगोपाळांना शंका असण्याचा माझा अनुभव जुना आहे. कठिण प्रश्न भाईकाकांना न विचारता माईआत्तेला विचारायला हवेत हा निर्णय वीस-एक वर्षांपूर्वी दिनेश, शुभा वगैरे त्या काळात के. जी. वयात असलेल्या माझ्या बालमित्रांनी घेतला होता. माझ्या व्यक्तिमत्वातच, फक्त बाळगोपाळांना दिसणारा अज्ञानप्रादर्शक गुण असावा, नाही तर इतक्या अडिच वर्षांच्या चिन्मयालाही आमच्या घरातलं सर्वात वरिष्ठ अपील कोर्ट शोधायला माझ्या लिहिण्याच्या खोलीत न येता स्वयंपाक घराच्या दिशेनी जाणं आवश्यक आहे हे कसं उमगतं?
सध्या, म्हणजे काय? या प्रश्नाच्या माऱ्याला तोंड द्यावं लागत आहे. बरं, नुसत्या उत्तरानी भागत नाही, मला दाखव असा हुकूम सुटतो. 'आकाश म्हंजे काय?' पासून ते 'आंगन म्हंजे काय?' इथपर्यंत हा प्रश्न जमीन अस्मान आणि त्यातल्या अनेक सजीव-निर्जिव वस्तूंना लटकून येत असतो.
'आंगन म्हणजे काय?' या प्रश्नाने तर माझी विकेटच उडवली होती. सहकारी गृहनिर्माण संस्कृतीत 'आंगण' केंव्हाच गायब झालेलं आहे. घरापुढली म्युनिसिपालटीनी सक्तीने रस्त्यापासून बारापंधरा फूट सोडायला लावलेली जमिनीची रिकामी पट्टी म्हणजे आंगण नव्हे. तिथे पारिजात असावा लागतो. जमीन शेणाने सारवलेली असावी लागते, कुंपणाच्या एका कोपऱ्यांत डेरेदार आंब्याचा वृक्ष असावा लागतो, तुळशीवृंदावनही असावे लागते. रात्रीची जेवणे झाल्यावर एखाद्या आरामखुर्चीवर आजोबा आणि सारवलेल्या जमिनीवर किंवा फारतर दोन चटया टाकून त्यावर इतर कुटुंबीय मंडळींनी बसायचं असतं अशा अनेक घटकांची पूर्तता होते तेंव्हा त्या मोकळया जमिनीचं आंगण होतं. कुंपणावरच्या जाईजुईच्या सायंकालीन सुगंधांनी आमोद सुनास जाहल्याचा अमृतानुभव देणारं असं ते स्थान चिनूच्या 'आंगन म्हणजे काय?' या प्रश्नाचं उत्तर देतांना तो अडीच वर्षांचा आहे हे विसरुन मी माझ्या बाळपणात शिरलो. माझ्या डोळयांपुढे आमच्या जोगेश्वरीतल्या घरापुढलं आंगण उभं राहिलं. त्याला त्यातलं किती कळत होतं मला ठऊक नाही. पण विलक्षण कुतूहलाने भरलेले दोन कमालीचे उत्सुक डोळे या आजोबाला काय झालं या भावनेने माझ्याकडे पाहाताहेत आणि माझी आंगणाची गोष्ट ऐकताहेत एवढंच मला आठवतं चिनूचं ते ऐकणं पाहण्याच्या लोभाने मी मनाला येतील त्या गोष्टी त्याला सांगत असतो. मात्र त्यात असंख्य भानगडी असतात. एखाद्या हत्तीच्या चित्रावरुन हत्तीची गोष्ट सांगून झाली की 'ही आता वाघोबाची गोट्ट कल' अशी फर्माईश होते. एकेकाळी पौराणिक पटकथेत झकास लावणीची 'स्युचेशन' टाकण्याची सुचना ऐकण्याचा पूर्वानुभव असल्यामुळे मी त्या हत्तीच्या कथेत वाघाची एन्ट्री घडवून आणतो. हत्तीच्या गोष्टीत वाघ चपलख बसल्याच्या आनंदात असतांना धाकटया बंधूंचा शिट्टी फुंकल्या सारखा आवाज येतो,
'दाखव'.
'काय दाखव?' मी.
'व्हाग!' चि. अश्विन.
हत्तीच्या चित्रात मी केवळ या बाबालोकाग्रहास्तव वाघाला घुसवलेला असतो. प्रत्यक्ष चित्रात तो नसतो. पण हत्तीला पाहून डोंगरामागे वाघ कसा पळाला याची गोष्ट रचावी लागते. सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या निर्मितिक्षम प्रतिभेची सकाळ-संध्याकाळ अशी तोंडी परीक्षा चालू असते. पहिली गोष्ट चालू असतांना 'दुशली शांग' अशी फर्माईश झाली की पहिल्या गोष्टीत आपण नापास झालो हे शहाण्या आजोबांनी ओळखावे, आणि निमूटपणाने दुसऱ्या गोष्टीकडे वळावे. या सगळया गोष्टींना कसलंही कुंपण नसल्यामुळे इकडल्या गोष्टीतला राजा तिकडल्या गोष्टीतल्या भोपळयांतून टुणूक टुणूक जाणाऱ्या म्हातारीला जाम लावून पाव देतो. वाघाचा 'हॅपी बड्डे' होतो आणि 'इंजिनदादा इंजिनदादा काय करतो?' या गाण्यातल्या इंजिनाला रुळावरुन उचलून आकाशात नेणारी स्चकृत कडवीही तयार होतात.
आज या वयातही सहजपणाने जुळलेलं एखाद्या कवितेतलं यमक पाहून एखाद्या शाळकरी मुलासारखा मला अचंबा वाटतो. शब्दांच्या नादानी कविता नाचायला लागली की आनंद कसा दुथडी भरुन वाहतो याचं दर्शन शब्दांच्या खुळखुळ्यांशी खेळणाऱ्या पोरांच्या चेहऱ्यावर होते. पण नातवंडाबरोबर आजोबांनाही तो खेळ साधला तर हरवलेलं बालपण पुन्हा गवसतं. हल्ली हा खेळ मला रोज खेळावा लागतो. एकदा या चिनू आशूला घेऊन 'चक्कड माडायला' निघालो होतो. 'बाबा ब्लॅकशिप' पासून 'शपनात दिशला लानीचा बाग' पर्यंत गाण्याचा हलकल्लोळ चालला होता. शेवटी हा तार सप्तकातला कार्यक्रम आवरायला मी म्हणालो, 'आता गाणी पुरे गोष्टी सांगा' गोष्टीत किंचाळायला कमी वाव असतो.
'कुनाची गोट्ट?'
'राजाची गोष्ट सांग... आशू, चिनू दादा गोष्ट सांगतोय गप्प बसून ऐकायची. हं, सांग चिनोबा...'
'काय?'
'गोष्ट!'
'कशली?' 'राजाची'. मग चिनूनी गोष्ट सांगायला सुरुवात केली.
'एक होता लाजा.' त्यानंतर डोळे तिरके करुन गहन विचारात पडल्याचा अभिनय, आणि मग दुसरं वाक्य आलं, 'तो शकाली फुलाकले गेला.'
'कोणाकडे?' शिकारीबिकारीला जाणाऱ्या राजांच्या गोष्टी मी त्याला सांगितल्या होत्या. पण फुलाकडे जाणारा राजा बहुदा शांतिनिकेतनातला जुना छात्र असावा.
'फु... ला... क... ले... ' चिनू मला हे आवाज चढवून समजावून सांगतांना माझ्या प्राचीन शाळा मास्तरांच्या आवाजातली 'ब्रह्मदेवानी अक्कल वाटतांना चाळण घेऊन गेला होतास काय पुर्ष्या ऽ ऽ ' ही ऋचा पार्श्वसंगीतासारखी ऐकू आली.
'बरं, फुलाकडे... मग?'
'मग फुलाला म्हनाला- फुला रे फुला, तुला वाश कोनी दिला?'
क्षणभर माझ्या डोळयांवर आणि कानांवर माझा विश्वास बसेना. हे एवढंसं गोरंपान ध्यान उकाराचे उच्चार करतांना लालचुटुक ओठांचे मजेदार चंबू करीत म्हणत होतं 'लाजा फुलाकले गेला आनि म्हनाला- फुला रे फुला, तुला वाश कोनी दिला?' एका निरागस मनाच्या वेलीवर कवितेची पहिली कळी उमलतांना मी पाहतोय असं मला वाटलं.
'मग फुल काय म्हणालं?' एवढे चार शब्द माझ्या दाटलेल्या गळ्यातून बाहेर पडतांना माझी मुष्किल अवस्था झाली होती.
'कोनाला?' 'अरे राजाला. राजानी फुलाला विचारलं ना, फुला रे फुला तुला वास कोणी दिला? मग फुल काय म्हणालं?'
'तू शांग...'
मी काय सांगणार कपाळ! फुला रे फुला तुला वास कोणी दिला या प्रश्नाचं उत्तर दयायला लागणारी बालकवी, आरती प्रभू किंवा पोरांच्या मनात नांदणारी गाणी लिहिणाऱ्या विंदा करंदीकर, पाडगावकरांना लाभलेल्या प्रतिभेची वाटणी चालू असतांना देवा पुढे चाळण नेण्याची दुर्बुद्धी मला नक्की झालेली असावी. 'फुला रे फुला तुला वास कोणी दिला?' या प्रश्नाचं उत्तर अजूनही मला सापडलेलं नाही. सुदैवाने परीक्षक हा प्रश्न विचारल्याचं विसरुन गेले असले तरी त्या परीक्षेत मी नापास झाल्याची भावना मला विसरता येत नाही. नुसती गोळया-जर्दाळूंची लाच देऊन आजोबा होता येत नाही. त्याला फुलाला वास कोणी दिला या प्रश्नाचं उत्तरही ठाऊक असावं लागतं आणि तेही यमकाशी नातं जुळवून आलेलं।



पुढे वाचा .........

एक जानेवारी : एक संकल्प दिन

एका गाढवाची गोष्ट




आणि एके दिवशी कधीही कारणाशिवाय न ओरडणारे ते दोन गाढव निष्कारण ओरडू लागले. एकमेकांना भयंकर लाथाळी करु लागले. चहूबाजूचे लोक धावून आले. 'अशी लाथाळी आम्ही जन्मात पाहिली नव्हती' असे जो तो म्हणू लागला. गाढवीण बुचकळयात पडली. जन्मभर सालसपणाने सेवा करणारे हे गाढव असे का वागताहेत? तिला काही सुचेना. येथे या गाढवांची लाथाळी चाललीच होती. त्या विवंचनेत एके दिवशी संध्याकाळी ती खिन्न मनाने गावातल्या भगिनी-समाजापुढला उकिरडा फुंकीत असताना तिला शेजारच्या कुंभाराची गाढवीण भेटली.

'का, गाढवीणबाई? अशा खिन्न का?'

'काय सांगू बाई तुला? आमच्या जोडीदार गाढवांची हकीकत कळली नाही का तुला?'

'त्या भयंकर लाथाळीची ना?' शेपूट वेळावीत गाढवीण म्हणाली.

'हो!' कुठल्याशा अध्यक्षीणबाईच्या गळयात पडलेला सुकलेला हार खुराने उडवीत पहिली गाढवीण म्हणाली. 'खरं सांगू का तुला?' 'काय?' 'हा लाथाळीचं कारण मला ठाऊक आहे. पण म्हटलं, उगीच दुसऱ्यांच्या भानगडीत आपण का पडा?' 'काय ते?' कानांना नाजुक हिसडा देत गाढवीण म्हणाली. तिच्या काळयाशार नाकपुडया थरथरत होत्या. 'विचारलंस तर सांगते बापडी! परवा काय झालं, मी आणि नाम्या कुंभाराची गाढवीण चरायला निघालो होतो. मी आपली नेहमी इथे भगिनी-समाजापुढे चरायला येते. इथे पुष्कळ अहवाल, भाषणं, प्रसिद्ध महिलांचे संदेश, वगैरे खायला मिळतात. आणि मागच्या खेपेपासून मला ही वर्तमानपत्रं पचेनाशी झाली आहेत. पण नाम्या कुंभाराच्या गाढवीणीनं आग्रह केला म्हणून वाचनालयापुढचा उकिरडा फुंकायला गेले मी! तिथे तुझे ते दोन गाढव आले होते. आणि कुणाला सांगू नकोस, पण दोघांनीही दोन निरनिराळ्या संपादकांची साप्ताहिकं खाल्ली. तेव्हापासून तिथेच त्यांची लाथाळी सुरु झाली... मागे एकदा त्या एका गाढवाने कसला मजूर पुढाऱ्याच्या भाषणाचा कागद खाल्ला होता, तेव्हा तो त्याच्या कुंभारालाच लाथा मारायला लागला होता.

'पण याला उपाय काय बाई?'

'अगं, सोपा आहे. गावात तो सिनेमा आहे ना तिथे नटींची चित्रं छापलेल्या जाहिराती वाटतात. पाच-पाच जाहिराती सकाळ- संध्याकाळ खायला घाल त्यांना. लगेच गप्प होतात की नाही पाहा.' असे म्हणून दुसरी गाढवीण 'महिला आणि क्रांती'तले उरलेले भाषण खाऊ लागली. पहिली गाढवीण सिनेमाच्या रस्त्याने धावू लागली.

'तिच्या धावण्यात एक मुक्त आनंदाचा अटूत आविष्कार होता' असे वाङमयमंदिरापुढे उभा असलेला एक गाढव नंतर कोणालासे सांगत होता।



पुढे वाचा ..................

मी-एक नापास आजोबा